आपल्याकडे पावसाने जरा उसंत घेतली असली, तरी इतर राज्यांमध्ये मात्र पावसाचा जोर बऱ्यापैकी वाढला आहे. अर्थातच पावसात डोकं वर काढणाऱ्या सर्व समस्या जाणवू लागल्या आहेत.
पावसाचं पाणी तुंबलं की, केवळ झाडांचं आणि कच्च्या घरांचं नुकसान होतं असं नाही, तर लाखो रुपये खर्चून बांधलेल्या घरांचं, लाखोंच्या गाड्यांचंही नुकसान होतं. मग अशावेळी काय करावं? नुकसान भरपाईसाठी विमा काढावा. यासंदर्भातच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

माणसांप्रमाणे वस्तूंचाही विमा काढता येतो, हे आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहित असेल. त्याआधारे कोणत्याही वस्तूच्या नुकसानाची भरपाई मिळू शकते. याबाबत युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापक संजय जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ गाड्यांचा नाही, तर घर, दुकान, गोदाम, अंगणात ठेवलेलं सामान, इत्यादींचा विमा काढता येतो. त्याचबरोबर पाऊस, पुरात नुकसान झालेल्यांनाही या इन्शुरन्स कंपनीद्वारे भरपाई मिळवता येते.
आमच्याकडे आतापर्यंत 10 कोटी रुपयांच्या भरपाईसाठी लोकांनी विमा काढला आहे’, असं संजय जोशी यांनी सांगितलं. ‘कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारं नुकसान असो, भूकंपामुळे होणारं नुकसान असो, अपघातामुळे झालेलं नुकसान असो, एखाद्याचं वाहन वाहून गेलं किंवा खराब झालेलं असो, आम्ही ग्राहकांना पूर्ण नुकसान भरपाई देतो’, असंही संजय जोशी यांनी सांगितलं. त्यांनी नागरिकांना ‘आजच विमा काढून नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानापासून वाचा’, असं आवाहनही केलं आहे. त्याचबरोबर, ‘जर एखादी गाडी पाण्यात बुडाली, तर ती सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. क्रेनच्या सहाय्याने ती उचलून सुरक्षितस्थळी ना. अन्यथा आधी झालेल्या नुकसानात गाडी सुरू करण्याच्या प्रयत्नामुळे आणखी भर पडू शकते’, असंही संजय जोशी यांनी सांगितलं.
